Saturday, 30 May 2026

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गड किल्ले- भाग १ - भैरवगड आणि सोनगड/नरसिंहगड


भैरवगड आणि सोनगड/नरसिंहगड  

कोकणातील किल्ले बोललं कि बहुतेक जणांना जलदुर्ग आठवतात. त्यात मी मे महिन्याचा गर्मीत केलेल्या योजनेमुळे बहुतेक जणांना आदी सागरी किल्लेच वाटले. माझी योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडकिल्ले, कोट आणि काही जलदुर्ग बघण्याचा होता. त्यात सहा दिवसाची सुट्टीचा बरेच जणांना जमत नव्हतं, तर काहींना फक्त शुक्रवार ते रविवार जमत होता. मग शेवटी अजय मिश्रा आणि मी दोघंच जायायचे ठरवले. मी सगळा आराखडा तयार ठेवला.  मे महिन्यामुळे ट्रेन बस सगळेच भरलेले होते. त्यात आम्ही इथून दुचाकी बसमधून नेणार आणि तिथे चालवणार होतो. पण अजय ने सांगितले आपण इथून बाईकने जाऊ. तस ठरल्याप्रमाणे आम्ही १ दिवस पूर्ण प्रवासाला द्यायचा ठरला. आणि १० मे ला आम्ही सकाळी ८ ला सुरु केलेला प्रवास रात्री ८ ला राजापूरला थांबवला. २० वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्गावरील कामामुळे ट्राफिक आणि खेड पासून पुढे लागलेल्या पावसाळामुळे आम्हाला उशीर झाला. पुढे कणकवलीला जाणार होतो पण बरेच हॉटेलला  फोन करून विचारला पण रहायला जागा नव्हती आणि उशीर हि खूप झाला होता. म्हणून मग राजापूरलाच थांबलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८ ला भैरवगड साठी प्रवास चालू केला. 


दिवस दुसरा

वनदुर्ग भैरवगड 

पायथ्याच गाव भैरवगड पण तालुक्यातून यायचं असेल तर मुख्य गाव नरडवे सांगायला लागते. कणकवली ते भैरवगड पायथा अंतर २७/२८ किमी आहे.

आम्ही सकाळी राजापूर-कणकवली भैरवगड असा ८०/८५ किमीचा अडीच तास प्रवास करत, पाऊणे अकराला गडाचा पायथ्याला पोहचलो. अकराला गड चढायला सुरवात केली. सुरवातीला जरा सुद्धा हवा नव्हती त्यात वरील पट्ट्यात सोंडेचा खडा चढ होता. पण सोंड असल्यामुळे क्वचित एकाद दुसरं झाड होतं त्यामुळे उन आणि प्रचंड गर्मी होत होती. पण सोंडेवर मध्ये मध्ये वारा हि लागत होता. म्हणून बर वाटत होते. तरी हि गडमाथ्यावर पोहोचायला आम्हाला सव्वा तास लागला.

गडाचे वर्णन
गडावर जास्त अवशेष दिसत नाही. गडावरील मुख्य ठिकाण म्हणजे भैरावाचं मंदिर. मंदिरासमोर चौथऱ्या वर दीपमाळ आणि दोन लहान तोफा आहेत. चौथऱ्याच्या पाठीमागे (आपल्या) उजव्या बाजूला मारुतीचं शिल्प आहे.  मंदिरचा परिसरात अजून काही उध्वस्त चौथऱ्याचे अवशेष दिसतात.

माथ्यावर पोहचण्याचा अगोदर काही पायऱ्या लागतात. तसेच माथ्यावर पोहचण्याअगोदर तटबंदी चे काही दगड दिसतात, पण ते सहजा कळून येत नाही. नीट बघितले कि कळते.

माथ्यावर मंदिराकडे जाताना वाटेतच समोर झाडांमध्ये एक बुरुज, तटबंदी दिसते. बहुतेक बालेकिल्ल्याचा बुरुज असावा. बुरुजाचा डावीकडून बुरुजाचा तटबंदीमधून वाट मंदिराकडे जाते. मंदिराच्या पाठी एक वाट जाते. ह्या वाटेने खाली गेलो असता खाली पाण्याचा झरा लागतो. आम्ही गेलो तेव्हा तिथे छोट्या डबक्यात खराब पाणी होते. पण पिण्यायोग्य नव्हते. आजूबाजूला पडलेल्या दारूच्या बाटल्यावरून समजून येत होते पाणी खराब का झाले असावे.

मंदिरासमोर डावीकडे एक वाट जाते. ह्यवाटेने पुढे गेलो असता पुढे एक मातीच्या ढिगाऱ्यासारखी एक छोटी तटबंदी दिसते. बहुतेक ह्या बाजूची तटबंदी असावी. त्याचा उजव्याबाजूने वाट पुढे जाते. पुढे जाऊन एक वाट डावीकडे खाली जाते. बहुतेक ह्यवाटेने दिगवले,रांजणगाव मध्ये जाता येते. तर एक वाट डावीकडे झाडीतून जाताना दिसते. ह्यवाटेने पुढे जाऊन  पाहिले असता वाट पुढे थोडी खाली जाते. आणि नंतर पुन्हा पुढे सपाटी लागून पुढे जंगलात जाताना दिसते. पुढे दाट जंगल असल्यामूळे जास्त पुढे न जाता पुन्हा पाठी फिरून गड उतरायला सुरवात केली. गडाचा डोंगर खूप पसरलेला आहे आणि त्यावर जंगल हि खूप आहे. त्यामुळे जर पूर्ण डोंगर फिरायचा असेल तर सोबत गावातील जाणकार वाटाड्या पाहिजे. 

तरी आम्हाला गड चढउतार आणि गड पहायला साडेतीन तास लागले. 

प्रवास माहिती:
ह्या गडावर जाण्यासाठी स्वतःची गाडी असेल तर उत्तम. कारण त्यामुळे तुम्ही एका दिवसात भैरवगड आणि सोनगड करू शकता.  एसटीने एका दिवसात एकच गड होईल.

कणकवली तालुक्यातून नरडवे साठी ४ फेऱ्या आहेत.त्यातील सकाळी ८ ची पहिली एसटी आहे. आणि संध्यकाळी ५/७ ची वस्तीची एसटी आहे. ह्या दोन एसटी भैरवगड गावात वर येतात,दुपारच्या दोन एसटी ( बहुतेक १२ आणि ३ ची) वर येत नाही 


सुरवातीला गडावर जाणारी वाट, दुसऱ्या फोटोत इथूनग वर डावीकडे चाड्याला लागते. आणि वर सोंडेवर पोहचल्यावर इथून खडी चढाई आहे. 
पहिला फोटो गडमाथा.दुसऱ्या फोटोत माथ्यावर पोहचण्याआधी पायऱ्या लागतात.
माथ्यावर असलेली तटबंदी आणि बुरुज आणि मंदिराचे फोटो 


एकदम वरील फोटो मंदिराबाहेरील तोफा, त्याखाली डावीकडे दहिवली  गावात जाणारी वाट तर बाजूच्या फोटोत गडाच्या दुसऱ्या बाजूने थोडी खाली जाऊन पठारावरून जंगलात जाणारी वाट. त्याखाली चौथऱ्याचे अवशेष आणि मंदिराजवळील मारुतीचे शिल्प. एकदम खालील फोटो. मंदिरापाठुन जाणाऱ्या वाटेने खाली गेलो असता पाण्याचा झऱ्याचा जागी पोहचतो.


मंदिराच्या समोरील वाटेने गेलो असता पुढे मातीच्या डिगारयात अवशेष दिसतात. नीट पहिले असता तटबंदी वाटते.


सोनगड साठी प्रवास 

भैरवगड पाहून आम्ही सोनगडसाठी निघालॊ.  दोन्ही गड समोरासमोर दिसतात. भैरवगड गावातून सोनगडच्या पायथ्याचा गावाला पोहचायला ८/९ किमी चा रस्ता आहे, पण आम्हाला गावातील लोकांनी शॉर्टकट म्हणून नवीन बनत असलेल्या धरणातून जायायला सांगितले. लोकांचा तो नेहमीचा पण कच्चा मातीचा  रस्ता होता. कारण तिथे  अजून काही वाडी आहेत. शॉर्टकटमुळे आम्हाला उलट जास्तवेळ लागला. त्यापेक्षा डांबरी रस्त्याने गेलो असतो तर लवकर पोहचलो असतो.दोन गडाच्या मधून गड नदी वाहते त्यामुळे नदी पलीकडील सोनगड/ नरसिंहगड कुडाळ तर भैरवगड कणकवली तालुक्यात येतो .


तिसरा दिवस 

सोनगड/ नरसिंहगड  

कोकणातून गडावर जायला दोन गावातून वाटा आहे. एक वाट पवारवाडी (दुर्गामाता नगर) मधून तर एक वाट घोटगे गावातून जाते. बहुतेक कोल्हापूर जिल्हातील शिवडाव गावातून ५ किमी ट्रेक करून हि येऊ शकता. हि वाट गडावर जिथे एक बुरुज आणि दरवाजाचे अवशेष आहे तिथून सोंडेवरून येत असावी. कारण त्या बुरुजाचा इथे पायऱ्या आहेत आणि खाली समोर वाट सोंडेवरून जंगलात जाताना दिसते. पण इथे चढायला अथवा उतरायला रशी लागेल.

शिवडाव वरून येणारी वाट जंगल पठारावरून येत असावी. कारण कोल्हापूरचा भाग वरती आहे. आणि आपण कोकणातून खालून गडावर चढतो.



पहिला अयशस्वी प्रयत्न मग वस्ती आणि दुसऱ्या दिवशी वाटाड्या सोबत गडावर

पहिल्या दिवशी आम्ही जिपीएस वर साडेतीन वाजता गड चढायला सुरवात केली. पण ह्या वाटेने क्वचितच लोक जात असावे म्हणुनच वाटेत झाडेझुडपे, पालापाचोळा खूप पडलेला होता. सुरवातीला १५/२० वाट मळलेली होती नंतर पुढे एके ठिकाणी झाडेझुडपे पडून वाट बंद झाली होती. पण जिपीएसची वाट तिथूनच पुढे चालली होती. मग बाजूच्या झाडाझुपातून वाट करत आम्ही पुन्हा जिपीएस च्या साहाय्याने वाटेला चालू लागलो. इथून पुढे वाटेत पालापाचोळा असल्यामुळे मळलेली दिसत नव्हती. तरी पण आम्ही ५ ते १० मिनिटे जाऊन बघितले.

सव्वा चार वाजले होते. पुन्हा पुढे वाट चुकली किंवा शोधण्यात उशीर झाला असता. तर गडावर पोहचायला उशीर होऊन, उतरताना काळोख झाला असता. आणि गड हि नीट पाहता आला नसता म्हणून, आम्ही पुढे जास्त धोका न घेता पाठी फिरायचा निर्णय घेतला.

पुन्हा कधी तरी करू ह्या निर्णयाने उद्याचा गडासाठी पुढची योजनेनुसार निघालो. जाताना पवारवाडीच्या गावातून एका घरातून गावातील वाटाड्याचा नंबर घेतला (पण तो पुढे आम्ही त्याला नंबर फिरवला त्यावेळी लागला नाही). आणि पुढे निघालो.

आम्ही घोटगे गावी चहापाणी साठी थांबलो. घोटगे गावातून वाट जाते म्हणून थोडी तिथे हॉटेलवर वाटाड्याची विचारपूस केली. त्यांनी गुरव वाटाड्याचा नंबर दिला. वाटाड्याला फोन केला, त्याने १००० रुपये सांगितले. त्यांनी कमी केले नाही. मग आम्ही आधी इथे राहायची आणि जेवायची सोय होते का पाहू, आणि झाली तर मग हा गड करूनच जाऊ असा विचार केला. कारण पुन्हा खास ह्यासाठी इतके लांब यायचं कधी जमेल माहित नाही.

हॉटेल वाल्याने सांगितले पुढे तेली खानावळ आहे, त्यांना विचारा. तिथे जेवायची आणि राहण्याची सोय होईल. तेलींना विचारले, त्याची एक जास्त खोली होती पण त्याचे पावणे आले होते. त्यामुळे तिथे आमची सोय झाली नाही. त्यांनी तिथेच पुढे त्याचेच चुलत भाऊ यांच भाजीचा दुकान आहे देविदास तेली त्यांना विचारायला सांगितले. त्यांना विचारला त्याचाकडे पण नव्हते. पण त्यांनी आम्हाला थोडं थांबायला सांगितले आणि दुसरारीकडे कुठे आमची सोय करता येते का बघत होते. शेवटी त्यांनी तिथे सिंधुदुर्ग बँकेचचा वर एक कर्मचारीची खोली होती तिथे सोय केली. तो २ दिवस सुट्टीसाठी बाहेर गेला होता, सोमवारी येणार होता त्याला फोनवर विचारून, आम्हाला तिथे राहायला दिले.

त्यामुळे आमची राहण्याची आणि अंघोळीची सोय झाली. त्यांना आम्ही जाताना ठरल्याप्रमाणे ५०० रुपये दिले. देविदास भाऊ आणि त्यांचा सोबत अजून एक गावची व्यक्ती आम्हाला राहण्यासाठी सोय व्हावी म्हणून खूप खटपट केली. मग रात्री आम्ही त्यांचेच चुलत भाऊ तेली ह्यांच्या खानावळी मध्ये जेवलो. जेवण पण एकदम घरघुती होत आणि प्रत्येकी १२०रु घेतले.



गड चढायला सुरवात

गुरव वाटाडे काकांनी आम्हाला सकाळी ६ वाजता लिंगेश्वर मंदिराजवळ बोलावले होते. तिथून त्यांनी आम्हाला काल ज्यावाटेने सुरवात केली होती तिकडेच घेऊन गेला. सकाळी पावणे सात वाजता आम्ही पुन्हा त्याच वाटेने गड चढायला सुरवात केली.

साधारण पाऊण तासात आम्ही गडाच्या सोंडी वर पोहोचलो. सोंडेवरून वाट, सोंडेच्या टेकाड वरून चढउतार करत. गडाला लागून गडावर जाते.  आम्ही काल जिपीएस वर चाललेलो आणि वाटाड्या नेत होता तीच वाट होती. त्याने जिथे वाट बंद झाली होती त्याचा बाजूने कोयत्याने झाडी तोडून वाट केली. आम्ही जिपीएसने गेलो असतो तर बरोबर गेलो असतो पण आम्ही उशीर झाला असल्यामुळे धोका नाही घेतला.

तासात आम्ही गड माथ्यावर पोहोचलो.

गडाची बुरुज आणि काही ठिकाणी तटबंदी अजून आपलं अस्तित्व टिकवून आहे. पण वाटते काही वर्षात डागडुजी न झाल्यास तीही ढासळून जाईल. पवार वाडीतून गडावर जाणार्‍या वाटेवर आपल्याला बुरुज, पायर्‍या लागतात. माथ्यावर मंदिराचा चौथर्‍यावर भैरवाची सुबक दीड ते दोन फुटाची मुर्ती आहे. त्या मूर्ती मागे अजून एक फुटाची छोटी भैरवची मुर्ती आहे. दर्शन घेऊन आम्ही मंदिराचा पाठच्या बाजूला असलेल्या बुरुजाकडे गेलो, ह्या बुरुजाला दरवाजा असावा, दरवाज्याची चौकट दिसत नाही. पण पायर्‍या आहेत. ह्या दरवाजाने वाट सरळ दोन डोंगरातील धारेवर जाताना दिसते ( बहुतेक शिवापूर गावात जात असावी). बुरुज पाहून आम्ही डावीकडे चालत गेलो. इथे एक गुहा आहे. ही गुहा आत मध्ये 50 मीटर अंदाजे खोल असावी. त्याकाळी शत्रू पासून लपण्यासाठी हि गुहा वापरत असे , असे वाटाड्याने सांगितले.


गुहेचा तोंड खाली होत आणी तिथे जाण्यासाठी डोंगराचा कडेने वाट होती, कालांतराने वाट निसरडी झाली होती. त्यामुळे रशी विना जाने धोक्याचे होते. पण तिच्यावरुन झाडा झुडपातून जाता आले असते. पण आमच्या वाटाड्याला लग्नाला जाण्याची घाई होती म्हणुन त्यांनी आम्हाला आत जनावर असेल सांगून तिथून घेऊन गेला. 


तिथून पुढे घोटगे गावाकडून जी वाट येते तेथे तटबंदी, बुरुज आणि दरवाजा दिसतो. पुन्हा आमच्या वाटाड्याला लग्नाची घाई झाली होती. तिथे काही नाही गुहा दाखवतो म्हणुन गड उतरायला सुरवात केली. घोटगे गावाची वाटे वरील बुरुज, तटबंदी जरा खालीच होती. तिथे गेलो असतो तर आम्हाला अजून एक तास लागला असता. म्हणुन मग मी हि लांबूनच फोटो काढला. 

गुरव जी गुहा दाखवत होता, त्याला भिवाची आकडी म्हणतात.


भिवाची आकडी

एक मोठ्या उभट कातळात उभा भेग होती. आकडी म्हणजे गावी लोक कंबरेला पाटी कोयती अडकवतात त्याला आकडी म्हणतात. त्या काळाचा आकार त्या सारखा होता म्हणून भीवाची आकडी म्हणतात. पण भिवा कोण कळला नाही. हि आकडी आपण जेव्हा गडाच्या एकदम वरच्या टप्प्यात पायर्‍या येतात त्याचा आधी कातळ टप्पा लागतो तिथे उजवीकडे दिसतो.  सोनगड वर जास्त करून घोटगे गावातून गावकरी येत असावी. गुरवने सांगितले नवरात्रीला  गडावर मंदिरात कार्यक्रम असतो त्याचवेळी फक्त एकदा हि वाट साफ करतो.


सोनगडला आम्हाला एकूण 3 तास गेले. दहा वाजता आम्ही पुन्हा घोटगे गावात चहा नाश्ता करून अकरा वाजता मनोहरगडला निघालो. पुढील भागात मनोहरगड आणि हनुमंतगड.



वरील तीन फोटोत सोनगड दिसत आहे. तर चौथ्या (वरील) फोटोत गडाचा सोंडेवरून काढलेला फोटो 

गडावर पोहचण्याचा अगोदर बुरुज आणि पायऱ्या आहेत. गडावरील भैरोबा ची मूर्ती, तोफ.
तसेच वाड्याचा चौथरा आहे.



(वरून खाली) गडावरील वाड्याचा चौथरा अवशेष आणि त=चौथऱ्या वरील फोटो. बुरुजाचा बाजूने दिसणाऱ्या पायऱ्या आणि सोंडेवरून जाणारी वाट, गडावरील माथा एका फोटोत दिसत आहे. तर शेवटी दोन फोटोत मंदिर


आडव्या फोटोत वरून एका बाजूची तटबंदी अवशेष, पाण्याची टाकी, घोटगे गावाचा वाटेवरील बुरुज आणि गुहेचा तोंड असलेली जागा आणि निसरडी वाट

वरती आणि खालील फोटो गडावरून दिसणारा परिसर. भिवाची आकडी (लंबाकृती दगडाचा फोटो) आणि वाटेत दिसलेले रानगवाच्या खुरांचे निशाण



Wednesday, 14 February 2024

रोहिडा- रायरेशवर-केंजलगड 10-11 Feb24

*रोहिडा- रायरेशवर-केंजलगड, मोहनगड,कावळागड आणि शिवतरघळ.* 
10-11 फेब्रुवारी, 2024

 _दिवस पहिला_ .
 *रोहिडा गड/ विचित्रगड* 
* पायथ्याच गाव- बाजारवाडी
* सकाळी 7.20 वाजता ट्रेकला 
   सुरवात.
* 11 वाजता गडफेरी पूर्ण करून 
   पायथ्याशी पोहोचलो
* पाउण तास गड चढायला लागला. 

* गडावर पाहण्यासाठी 7 बुरुज,
  तटबंदी, पाण्याचा टाकी, 1छोट तळ 
  राजवाड अवशेष, मंदिर, जुनी 
  मातीच्या भांडीचे अवशेष आहेत. 

* गडावर वाघजाई बुरुजाचा बाजूने   
   समोर धारेवर असलेल्या 
   वाघजाई मंदिरात जाता येते. 
   देवीच्या नावावरून ह्या बुरुजाच 
   नाव ठेवलं आहे. 
    इथून खाली दिसणार्‍या 
   चिखलगावमध्ये वाटाड्या सोबत 
   असेल तर उतरू शकतो.

* रोहिडा-रायरेशवर अंतर रस्त्याने 36km.

 *रायरेशवर पठार* 
* पायथ्याच गाव - कोले॔ गाव
* पठारावर जाण्यासाठी घाट रस्ता 
   आहे. किंवा
* कोले॔ गावातून 2 तासात चढूनजाऊ 
  शकता 
* रायरेशवरला गाडी जेथे पार्क होते, 
   तिथपासून 15 मिनटात पठारावर 
   पोहोचतो.

* दुपारी सव्वा एक वाजता सुरवात 
  केली. 
* संध्याकाळी पाच वाजता पुन्हा 
   पार्किंग मध्ये पोहोचलो.

* रायरेशवर पठारावर एक लेणी, 
   रायरेशवर मंदिर, कुंडातुन पाणी येते 
   ते टाक, सात रंगाची माती आणि 
   एक छोट पाण्याच टाक आहे. 
   रायरेशवर पठार पसरलेल 
   आहे, त्यामुळे हे सगळ बघण्यात 
   वेळ जातो. 

 *केंजलगड* 
* पायथ्याच वस्ती / गाव- 
   पाकेरेवस्ती, कोले॔ गाव
* संध्याकाळी 5 वाजता ट्रेकला 
   सुरवात.
* संध्याकाळी 6.15 वाजता गड 
   माथ्यावर.
* संध्याकाळी 7.10 ला गडफेरी 
  करून पाकेरेवस्ती गावात पोहोचलो 
* उतरते वेळी 20/25 मिनिटात
   पाकेरेवस्तीत पोहोचलो.

* रायरेशवर पार्किंग ते केंजलगड 
  पाकेरेवस्ती रस्त्याने 10 मिनटात 
  पोहोचतात. पाकेरेवस्तीतून 
  अर्ध्या तासात/तासाभरात 
  गडावर पोहोचता येते.

* आम्ही पाकेरेवस्तीतून चडाई न   
   करता. रायरेशवर पठार आणि 
   केंजलगडच्या मध्ये, केंजलगडची 
   एक धार रस्त्याला येते. या धारेवरून 
   चढायला सुरवात केली. ह्या वाटेने 
  आम्ही सव्वा तासात गडावर 
  पोहोचलो. 
   **वाट मळलेली आहे. पण 
  केंजलगडचा कातळटोपी /वरील 
  कातळाच्या बाजूने वळसा घालत 
  जाणारी वाट. जरा निसरडी आह़े. 
  त्यामुळे जपूनच जायला लागते.** 
* गडमाथा लहान असल्यामुळे गड 
   लवकर पाहून होतो. गडावर 
   तटबंदी, बुरुज, 
  पाण्याची टाकी, कोठार, 
  चुन्याचा 2 घाणे, मंदिर (तुटलेल, 
  उघड्यावर) आहे. गडाच्या कातळात 
  कोरलेल्या पायऱ्या.

* रात्री वस्तीला मोहनगडच्या 
   पायथ्याच गाव दुर्गाडी येथे गेलो.

 *दिवस दुसरा* 
* पायथ्याच गाव- दुर्गाडी, शिरगाव.
* दुर्गाडी गावातून चढायला दीड तास 
   लागला.
* शिरगाव उतरायला 1 तास लागला 

* मोहनगड साठी शिरगाव आणी 
  दुर्गाडी गावातून जाता येते. दोन्ही 
  वाटा काळकाईचा ठाण पाशी येऊन  
  मिळतात. 
* _काळकाईचा ठाण्यापासून गावकरी 
   बिना चप्पल गड माथ्यावर जातात._ 

* *शिरगावची वाट* मळलेली आहे.     
    हि वाट सरळ सोंडे वरुन येते, 
    त्यामुळे बर्‍यापैकी सरळ वर चढत 
    जाते. वाटेत जागो जागी बानाचे 
    चिन्ह केले आहेत़. त्यामुळे न 
    चुकता जाऊ शकता. ह्या वाटेने 
   आपल्याला मोहनगड सतत समोर 
   दिसतो.

 * *दुर्गाडीच्या वाट* फिरून येते 
    त्यामुळे गावातून गड दिसत नाही. 
    डोंगराच्या एका सोंडेवर आल्यावर 
    गड दिसतो. 
    ह्या सोंडेवरुन आजूबाजूचा 
    परिसर सुंदर दिसतो. हि वाट 
    जंगलातून येते आणि एके ठिकाणी 
    गडाचा कातळ टोपीच्या पायथ्याच 
    जंगलातून काळकाईच्या 
    ठाण्यापाशी मिळते.

* ह्या वाटेने सुरुवातीला गावातील 
  जनी मातेचा मंदिर लागते. ह्या 
   मंदिरात 10/12 जण राहू शकतात. 
   _वाटाड्याने सांगितले. काही लोक 
   इथे दारू प्यायचे म्हणून मंदिर बंद 
   असते._ 

* *गडाचा माथा* लहान आहे. 
   गडावर जननी /दुर्गा माता मंदिर, 
   एक चौथरा (किंचित राहिलेला),
   4 टाकी (1 छोटी) आहे.
   __वाटाड्याने सांगितले, गावची 
   काही जुनी लोक 7 टाकी आहेत़   
   सांगतात.पण कोणाला बहुतेक 
   माहीत नाही.__ 

* *एका टाकी कडे जाण्याची वाट  
   अवघड आहे. जपून जायला 
    लागते.* 

* शिरगाव मंदिराच्या पत्र्याचा मंडपात 
   25/30 लोक वस्ती करू शकतात.

 *कावळा गड* 
* गड चढायला अर्ध्या तास लागला.
* पूर्ण गडफेरी करुन पायथ्याशी 1 
  तासात पोहोचलो.

* वरंधा घाटात महाड आणि भोरच्या 
  सीमेवर खिंड आहे तिथेच गड   
  चढायला सुरवात होते.

* गडाचा माथा मोठा आणि पसरलेला  
  आहे. पण गडावर आम्हाला जास्त 
  अवशेष दिसले नाहीत. (गडावर 
  अजून तटबंदी, इत्यादी अवशेष 
  आहेत. असे वाचल होतं. नक्की कुठे 
  माहीत नव्हते. गडावरील जंगल मुळे 
  शोधायला जमल नाही.)

* सुरुवातीला काही पायर्‍या लागतात,
   गडावर 2 टाकी आहेत 
   (1 सुखलेल) तिथेच तांदळा 
   स्वरूपातील देव, 
   1 चौथरा, गडाचा एका टोकाला 
   गोल बुरुजावर भगवा फडकविला 
   आहे. 

* **रस्त्याचा पलीकडे गडाचा दुसरा 
   भाग आहे.** 
* इथे आम्हाला 6 टाकी, जुन 
   वाघजाई मंदिर, कातळातील 
   पायऱ्या दिसल्या 
    _( मंदिराच्या पुढे उजवीकडे 
   खालीआहे, पण सध्या ह्या वाटेवर 
   गुरढोर तसेच बहुतेक माणसे जाऊ 
   नये म्हणुन लाकडे टाकून वाट 
   बंद केली होती.)_ 

* ह्या टाकी पाहण्यासाठी (भोर 
  बाजूला) टपरीवाले आहेत. त्यांचा   
  थोडं पुढे, एक वाट वर जाते. 
  इथून/10 मिनटात टाकी 
  जवळ पोहचतो. टाकी डावीकडे 
  आहेत आणि मंदिर उजवीकडे.

 *शिवतरघळ* 
* गड पाहून आम्ही शिवतरघळ येथील
  रामदास स्वामी ह्यांची गुहा पाहायला 
  गेलो.

* गुहेत दर्शन घेऊन दुपारी साडेतीन 
  वाजता. मुंबई साठी प्रवास सुरु 
  केला.

Monday, 5 February 2024

हटकेश्वर ते लेण्याद्री

04022024 रविवार
* कोळेवाडी -हटकेश्वर- लेण्याद्री  
   गणपती पर्यंत 12.5 km चा 
   ट्रेक आहे. 
* कोळेवाडी गावातून सकाळी 6.30 
   वाजता ट्रेकला सुरवात 
   केली, सकाळी 10 वाजता आम्ही 
    मंदिरा जवळ पोहोचलो. 
   लेण्याद्री गणपती मंदिरात दुपारी 
   3.30 वाजता पोहोचलो.
* एकूण 9 तास लागले.
* कोळेवाडी ते हटकेश्वर मंदिर 
   साडेतीन तास चढायला लागले.
* हटकेश्वर ते लेण्याद्री गणपती मंदिर 
  साडेतीन तास लागले.

* डोंगरावर हटकेश्वर शिव मंदिर, 
  2 गुहा, 3 टाक्या आहेत. 
  माथ्यावर हे सगळ पाहण्यासाठी वेळ 
  लागतो.
* छोटया गुहेमध्ये गणेश मुर्ती आहे. 
* दुसरी गुहा आतमध्ये खोलवर अरुंद 
   होत जाते, किती खोलवर 
   आहे कळत नाही. 
* मंदिराच्या बाजूला पाण्याची टाक 
   आहे, पण त्यातील पाणी   
   पिण्यास योग्य नाही. जेथे नैसर्गिक 
   पूल/नेढ आहे त्या बाजूला  
   2 टाक आहेत, त्यात एक बुजलेले 
   आहे. बुजलेल्या टाकीच्या 
   वरील, टाकीतील पाणी पिण्यास 
   योग्य होते. 

* कोळेवाडी तून जाणारी वाट 
   मळलेली नाही, त्यामुळे चुकायला 
   होते. खास करून वरच्या टप्प्यातील 
   वाट, काही ठिकाणी 
   कारवीच्या झाडीतून वाट जाते. 
   बरेच ठिकाणी वाटेत माती 
   भुसभुशीत आहे, त्यामुळे पाय 
   सरकन्याचे प्रमाण जास्त आहे. 
   खास करून माथ्यावर पोहोचण्याचा 
   आदि एक कातळ टप्पा 
   आहे. तिथे माती जास्त पडते. ह्या   
   टप्प्यावर दोर घेऊन गेले तर 
   जास्त सोयीचे ठरेल.

* रात्री कवडधारा देवी मंदिरात वस्ती 
   केली, मंदिर महामार्गाला 
  लागूननच आहे. मंदिरात 50 माणसं 
  झोपू शकतात. पण मंदिर 
  संध्याकाळी बंद करतात, त्यामुळे 
  गावातील पुजारी कडून चावी 
  आधीच घ्यायला लागते. कोळेवाडी 
  गावात आत ही मारुती 
  मंदिर आहे, ते मंदिर ही संध्याकाळी 
  बंद करतात.

* आम्ही हॉटेल हर्ष मध्ये सकाळच्या 
  नाश्त्याची सोय केली होती. 
   त्यावेळी त्या हॉटेल मालकाने 
  आमच्यासाठी मंदिराची चावी घेऊन     
  ठेवली होती. आम्ही त्यांचा कडून 
  चावी घेतली.

* हॉटेल हर्ष - गणपत कुमाकर - 
   9766562973

Friday, 4 November 2022

जालना, बुलढाणा प्राचीन ५ - देऊळराजा येथील गडी, बारव, सिंधखेडराजा दर्शन.

जालना, बुलढाणा प्राचीन ५ - देऊळराजा येथील गडी, बारव, सिंधखेडराजा येथील महाल, समाधी इत्यादी. जालना येथील मस्तगड भुईकोट, दरवाजा.

आज आम्ही देऊळराजा येथील गडी, बारव पाहून.  सिंदखेडराजा पाहून जालण्याला जाऊन मुंबई साठी ट्रेन पकडणार होतो.

देऊळगावराजा बारव 
पहिली बारव
ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी साडे सहा वाजता देऊळगावराजा साठी निघालो. सिंदखेडराजा ते देऊळगावराजा 15 कि.मी आहे. अर्धा तासात आम्ही तेथे पोहोचलो. पहिले आम्ही गावाच्या थोड्या बाहेर असलेल्या बारव पाहायला गेलो. गावातील लोकांना विचारात विचारात, आम्ही तिथे पोहोचलो. पण रस्त्याचा बाजूला सकाळी बरेच जण चिंपाट घेऊन बसले होते. त्यामुळे आम्ही तोंडाला मास्क घातला, कारण पूर्ण रस्ताच भरला होता. त्यात आम्ही एकदमच चुकीच्या वेळेत पोहोचलो होतो. ह्या वरुन कळलं गाव हागणदारीमुक्त नाही.

रस्त्याला उजव्या बाजूला एकाचा खाजगी जागेत बारव आहे. तिथे त्याची शेती आणि घर दोन्ही आहे. त्यामुळे आम्ही त्यांना विचारलं आणि त्यांनी आम्हाला विहीर दाखवली. बारव मोठाची विहीर सारखी आहे आणि त्याला जाण्यासाठी पायऱ्या आहेत. काही पायऱ्या उतरून दोन्ही बाजूला छोटी  देवडी आहेत त्यातील एका देवडीच्या बाजूलाच भिंतीवर एक शिलालेख आहे. 
शिलालेखचा फोटो शेवटी दिला आहे. 

दुसरी बारव आणि प्राचीन समाधी 
ती बारव बघून, अजून त्याचा पुढची बारव पहायला गेलो. 
हि बारव अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरच पुढे एका शेतात आहे. बारव आणि प्राचीन समाधी आहे. समाधी बहुतेक कोणी सरदार किंवा राज घराण्यातील व्यक्तीची असावी. त्यामुळे तिची डागडुजी चांगली ठेवली आहे. पण बारव दुर्लक्षित आहे, त्यामुळे पूर्ण झाडा झुडपाने झाकलेली दिसते. तसेच विहिरीच्या बाजूला असलेल्या मोठा जवळ काही घरा सारखा अवशेषची भिंत ढासळलेली दिसते. ही बारव, पहिल्या बारव सारखीच दिसते, पण आकाराने लहान दिसते. बहुतेक त्याकाळी बारवचे पाणी समाधी समोर असलेल्या चौकट मध्ये सोडत असावेत. सुशोभिकरण साठी. हि बारव बघून पुन्हा आम्ही गावात बालाजी मंदिराच्या बाजूला असलेली बारव पहायला गेलो. पुन्हा नाकतोंड झाकुन घेतलं आणि निघालो.

बालाजी मंदिरा शेजारी असलेली बारव आणि दरवाजा आणि तटबंदी 
बालाजी मंदिराच्या बाजूला लागून रस्त्यालाच बारव आहे. 
रस्त्याचा बाजूला 10 ते 12 फुटाची भिंत असल्यामुळे दिसत नाही, पण त्या भिंतीला सीमेंटच्या दोन छोट्या चौकनी खिडकी आहेत, त्या मधून थोडीशी दिसते. त्या भिंतीच्या दोन बाजूला बारव मध्ये जायला पायऱ्या आहेत. पण तिथे लोकांनी कचरा आणि अडगळ ठेवली आहे. आम्हाला वाटलं आम्हाला काही बारव बघायला भेटत नाही, पण तिथे एकाने सांगितले, मंदिराच्या समोर मंदिर कार्यालयात विचारा ते तुम्हाला सांगतील. 

कार्यालयात विचारले असता तेथील एक काका चावी घेऊन आम्हाला बारव दाखवायला आले. 

बारव वर्णन
बारव खूप सुंदर आहे. बारवच पाणी थोडं स्वच्छ दिसत होते. त्यात पाईप टाकले होते, त्यावरुन ते पाणी कशाला तरी वापरत असावेत. बारवला दोन बाजूने दरवाजा आहेत. तसेच बारवच्या थोडीशी मध्ये अशी, एक मजली दगडी इमारत आहे, त्याचावर बहुतेक नंतर बारीक विटांने अजून एक मजला (बहुतेक नंतर बांधलेला दिसतो) आहे. त्या मजल्यावर जाण्यासाठी भुयार सारख्या पायऱ्या आहेत. तिथून वर गेले असता आपल्याला वरुन बारव दिसते पण पूर्ण दिसत नाही. आणि तेथे वर जुन घर आहे. आम्ही बारव पाहून नाश्ता करून अजून आजुबाजूचे अवशेष पाहून घेतले. मंदिराच्या आजूबाजूच्या पूर्ण परिसरात आपल्याला जुनी वाड्या सारखे घर दिसतात. ह्या वरुन अंदाज लावता येतो. त्याकाळी  ह्या बारवच पाणी प्यायला वापरत असावेत.
दरवाजा 
बारवच्या पुढे, रस्त्याला समोर दरवाजा आहे. आणि बाजूला थोडी फार तटबंदी दिसते. त्याकाळी एक प्रवेश द्वार असावे. 
बाकी नामशेष झालेली दिसते. आम्ही मंदिराच्या समोरच एका छोट्याशा गल्लीत वाडा आहे. वाडा सध्या आतून पूर्ण ढासळलेला आहे, फक्त बाहेरून भिंती चांगल्या दिसतात. तो पाहून घेतला.

शाळेतील गडी 
तो वाडा बघून आम्ही कस्तुरबा कॉन्व्हेंट शाळा बघायला गेलो. कारण त्या शाळेत गडीचा दरवाजा आहे, आणि त्याला लानूनच अथवा त्या गडीतच शाळा बांधली आहे.
गुगल नक्षा वरती बघितल्या वर अंदाज येतो बहुतेक हि गडी असावी. कारण त्याचे तीन बाजूचे बुरुज आणि तटबंदी दिसते. एका बाजूने पडलेली किंवा ढासळलेली असावी, त्यात अतिक्रमण मुळे एका बाजूला घर दिसतात. 

शाळेच्या दरवाज्याने आत गेलो असता. डावीकडे आपण मुख्य दरवाजा आहे, तेथे जातो. दरवाजा रस्त्याने दिसतो पण रस्त्याचा बाजूने प्रवेश बंद ठेवतात. दरवाजा चांगल्या स्थितीत दिसतो. त्याला बहुतेक शाळेने रंगवलं आहे. 

शाळेच्या दरवाज्याने आत आल्यावर उजवीकडे आपल्याला दोन बुरुज दिसतात. पण त्यावर वाढलेली झाडे झुडपे वाढलेली आहेत आणि मुख्य करुन बुरुज आतून ढासळलेला आहे, त्याचा माती वरुन चालणे धोकादायक वाटत होते. म्हणून आम्ही बुरुज लांबूनच बघितला. पन बुरुज आणि तटबंदी बाहेरच्या बाजूने चांगली दिसते. 

त्यामुळे आम्ही बाहेरून बघायला गेलो. पण त्या रस्त्याने पुढे चालू लागलो असता,  एक जन रस्त्याला चिंपाठ घेऊन बसलेला दिसला. आणि तेथे आलेला दुर्गंध आणि रस्त्याला दिसलेली घाण आम्ही समजलो, हा रस्ता हागणदारीचा आहे. मग आम्ही तिथूनच फोटो काढून पाठी फिरलो.

सिंदखेडराजा दर्शन
तिथून आम्ही नाश्ता करून पुन्हा सिंदखेडराजाला आलो.
दुचाकी असल्यामुळे आम्हाला फिरायला जास्त वेळ लागला नाही.
सिंदखेडराजाला बघण्यासारखे म्हणजे, लखोजीराजे ह्यांचा वाडा जेथे राज माता जिजाऊ साहेब यांचा जन्म झाला. तसेच लखोजीराजे ह्यांची समाधी, शिवाच एक प्राचीन मंदिर. काळा कोट बघण्यासारखे आहे. 

लखोजी राजे जाधव ह्यांचा राजवाडा
पहिला आम्ही राजवाडा पाहायला गेलो. वाड्याचा बाहेरच्या तटबंदी अजून चांगल्या दिसतात. पण आत मात्रं चौथरे दिसतात. एके ठिकाणी जिजाऊ साहेबांच जन्म झाला, ती खोली आहे. चौथरा खाली मोठा तळ मजला आहे  बहुतेक त्यावेळी तेथे सैन्य ठेवत असावेत. थोडं पाठी मागे राजदरबार आहे. आम्ही महाल बघून 
काळा कोट बघायला गेलो.

काळा कोट, शिव मंदिर आणि समाधी
काळा कोटमध्ये बहुतेक संग्रहालय बनवत आहेत, त्याच काम चालू आहे. आम्ही तिथे असलेल्या प्राचीन मुर्ती बघायला गेलेलो. ते पाहून आम्ही शिव मंदिर पाहायला गेलो. शिव मंदिर पाहून आम्ही लखोजी राजेची समाधी पाहिली. 

जालना प्रवास
आमचं सिंदखेडराजा बघून झालं. मग आम्ही दुपारी जालना साठी निघालो.  कारण तेथून रात्री आमची मुंबई साठी ट्रेन होती. आम्ही संध्याकाळी ४\५ दरम्यान पोहोचलो. आमच्याकडे बराच वेळ होता. त्यामुळे आम्ही तेथील रस्त्यात लागलेला दरवाजा, तसेच मस्तगड भुईकोट पाहिला.

मस्तगड भुईकोट
भुईकोट होता, रस्त्याचा बाजूने बाहेरून एका बाजूची तटबंदी दिसते. भुईकोटला दरवाजा नाही पण दरवाजा आतील भागातील देवडी आहे. तसेच दरवाजातून आत गेल्यावर एका बाजूला (उजव्या बाजूला) थोडी तटबंदी लागते आहे. आत मैदानात दोन तोफा ठेवलेल्या आहे.
ह्या भुईकोट मध्ये आता नगर परिषदेची पाण्याची उंच टाकी बांधली आहे. आत बरेच नगर परिषदेचे भंगार सामान काही जुन्या गाड्या ठेवल्या आहेत. तसेच काही घरे पण आहेत. आणि बहुतेक काही बैठी कार्यालय आहेत. बहुतेक जालना नगर परिषदेची असावीत. कारण भुईकोटच्या मुख्य दरवाजा वर जालना नगर परिषदेचा फलक लावला आहे.

भुईकोट बघून एक मंदिरात काही वीरगळ, आणि प्राचीन मुर्ती आहेत. त्या बघितल्या. 

अश्या प्रकारे आमचा जालना, बुलढाणा दौरा पूर्ण झाला.

धन्यवाद
पाहिली बारव 


देवडीच्या बाजूला असलेला शिलालेख 







दुसरी बारव आणि समाधी 







बालाजी मंदिरा शेजारी असलेली बारव


बालाजी मंदिरा येथील दरवाजा 



मंदिराजवळ असलेले जुनी घरे. 

शाळेतील गडीचा दरवाजा 





गडीची तटबंदी आणि बुरुज 

गडीची तटबंदी आणि बुरुज 

गडीची तटबंदी आणि बुरुज 


मस्तगड भुईकोट, जालना

जालना येथील एका मंदिरात ठेवलेल्या प्राचीन मूर्ती. 


Monday, 29 August 2022

जालना, बुलढाणा प्राचीन ४- लोणार दर्शन, अंजनीची बारव

जालना, बुलढाणा प्राचीन ४- लोणार दर्शन, अंजनीची बारव

चौथ्या दिवशी आम्ही लोणार पाहून संध्याकाळी सिंदखेडराजाला वस्तीला गेलो. वाटेत अंजनीची बाराव पाहून पुढे गेलो. सिंदखेडराजाला खूपच कमी हॉटेल्स आहेत, त्यामुळे लोणार वरुन सकाळी लवकर उठून आलो असतो, तर बरं झालं असतं. असे वाटू लागले. पण बड्या मेहनतीने शेवटी एक हॉटेल मिळाल. त्यामुळे सिंदखेडराजाला राहण्याची योजना करू नका.

लोणार दर्शन
लिंबी बारव 
आज आम्ही सकाळी उठून पूर्ण लोणार फिरायचा ठरवलं. सगळ्यात पहिला आम्ही लिंबी बारव बघायला गेलो. बारवचा दरवाजा बंद होता. बहुतेक कोरोना मुळे बंद ठेवली होती. बारवला लोखंडी जाळीचा कुंपण होता,  तेथे राहणारे मुलांना पाहून आम्हीही तसेच  त्यावरून उडी मारून आम्ही गेलो.
बारवची अवस्था खराबच होती. त्यामुळे जास्त काही नक्षी काम दिसल नाही, बहुतेक जास्त नक्षी काम नव्हते. त्यामुळे आम्ही बारव पाहून दैत्य सुदन मंदिर पाहायला गेलो. 
लिंबी बारव

दैत्यसुदन मंदिर 


दैत्यसुदन मंदिर 




दैत्यसुदन मंदिर

दैत्य सुदन मंदिर
दैत्य सुदन मंदिर खूपच सुंदर आहे. मंदिर पाहता, आपण कर्नाटकच प्राचीन मंदिर पहात आहोत असे वाटते. पण मंदिर आतून मात्रं साध्या विटांच किंवा जास्त कलाकृती केलेल दिसत नाही. बहुतेक मंदिर आतून मजबूत व्हावे  म्हणून मंदिरात काही बद्दल केले असावेत, किंवा पुन्हा नवीन काम केले असावे. असे मला वाटते.
मंदिराच्या बाजूला, आपल्या डाव्या बाजूला छोट प्राचीन मंदिर आहे. त्यात ब्रह्म, विष्णु आणि गरुड मुर्ती आहेत. आम्ही लवकर गेलो होतो. त्यामुळे तिथे असलेल्या पहारेकरीची नऊ वाजता येण्याची वाट पहात होतो. पण तो काही आला नाही. मग आम्ही दहा वाजता, लोणार सरोवर पहायला निघालो.

धर्मशाळा
सरोवरलाजो रस्ता जातो तिथे सरोवरला पोहोचण्याआधी एक चौक लागते.  त्याचा डाव्या बाजूला रस्त्यालाच पण थोडी उंचावर अशी धर्मशाळा लागते, ती पाहिली. धर्मशाळा बंदच होती, त्याचा लोखंडी दरवाजा वरुन गेलो, बहुतेक कोरोनामुळे लोकांसाठी बंद होती.

लोणार सरोवर आणि सरोवर काठाची मंदिर
लोणार सरोवर जग प्रसिद्ध आहे, मला जास्त काही सांगायची गरज नाही. पहिला सुरवातीचे गोमुख मंदिर आणि पापहरेश्वर मंदिर पाहून, आम्ही तलाव काठावरची मंदिर पाहायला गेलो.
गोमुख मंदिर नंतर खाली सरोवर कडे जाताना वाटेत अजून काही  प्राचीन मंदिर लागतात. गोमुख मंदिर नंतर कुमारेश्वर मंदिर, चोपड महादेव मंदिर, यज्ञेश्वर महादेवी मंदिर, कपिला संगम मंदिर, विष्णु बघिच्छा मंदिर, रामायण मंदिर, वाघ महादेव मंदिर,  मोर महादेवी मंदिर,  कमळजा देवी मंदिर.

कमळजा देवीच्या मंदिराच्या पुढे ही एक अंबरखाना आहे. पण कोरोना मुळे सरोवर बंद असल्यामुळे तेथील झाडी खूप वाढल्यामुळे जंगल झाले होते. त्यामुळे तेथील वाट बंद केली होती. सागर ह्याआधी जाऊन आला होता, त्यामुळे त्यांनी सांगितले. सरोवर काठ मोकळा असतो आणि तिकडे काही विशिष्ट दगड हि दिसतात. पण पूर्ण जंगल वाढल्यामुळे, सरोवराचा काठा पर्यंत जंगल पसरले होते, त्यामुळे काठ दिसत नव्हता. 

नंतर आम्ही view  tower वरुन सरोवराचा दृश्य पाहायला गेलो. इथे हि वेगळी तिकीट घ्यायला लागते. पुन्हा इथे DSLR कॅमेराने फोटो काढून देत नव्हते. पण आम्ही सरोवर पहायला जाताना खाली जंगलात जाते वेळी, (माझ्या कॅमेरा माझा गळ्यात लटकलेला होता) पावती फाडली होती. ती दाखवली त्यावेळी त्यांनी आम्हाला फोटो काढून दिले. सागरकडे पन DSLR होता, पण त्याच्या बॅगेत होता, त्यामुळे त्या वन अधिकाऱ्याला कळल नाही. पण त्या पावतीचा आम्हाला इथे फायदाच झाला. एकच पावती असल्यामुळे, आम्ही दोघांनी आलटून पालटून एकमेकांचे कॅमेरे काढत होतो. कारण पुन्हा एक पावती एक कॅमेरा असा काही बोलायला नको,  म्हणून आम्ही धोका पत्करला नाही.

सरोवर पाहून आम्ही बारा वाजता हॉटेल वर पोहोचलो. 
तसेच आम्ही बॅग घेऊन सिंदखेडराजा साठी निघालो. वाटेत आम्ही अंजनीची बारव पाहिली आणि वस्तीला पोहोचलो.

अंजनीची बारव
अंजनी लोणार पासून सुलतानपूर मार्गे १६.९ कि.मी आहे. आम्ही अर्ध्या तासात तिथे पोहोचलो. 
पाऊस जास्त झाल्यामुळे  बारव एकदम भरली होती, त्यामुळे नीट पाहता नाही आली. तरी पण बारवच्या एका बाजूला छोटा मंडप दिसतो. बाकी बारवच्या तीन बाजूला पायऱ्या आहेत. आम्ही ४.३० वाजता, सिंदखेडराजासाठी  पुढे निघालो. अंजनीवरुन सिंदखेडराजा ४१.४ कि.मी आहे. आम्हाला पोहोचायला एक ते सव्वा तास लागला.
त्यानंतर आम्हाला हॉटेल शोधायला वेळ लागला. शेवटी एक बालाजी लॉज मध्ये आम्ही ९०० रुपये भाडे देऊन राहिलो. पण हॉटेल ठीक होत.


दुसर्‍या दिवशी, आम्ही सकाळी लवकर उठून देऊळराजा येथील गडी, आणि काही बारव पाहणार होतो. आणि नंतर सिंदखेडराजा येथील लखोजीराव जाधव ह्यांचा राजवाडा, समाधी स्थळ, प्राचीन मंदिर आणि बारव पाहून जालना साठी निघणार होतो. वर सांगितल्याप्रमाणे आम्हाला हॉटेल शोधायला खूप मुश्किल झाले.

अंजनीची बारव

अंजनीची बारव


गोमुख मंदिर












 कमळजा देवी मंदिर



धर्मशाळा

धर्मशाळा



लोणार सरोवर view  tower  वरून टिपलेले दृश्य.